बुधवार, १९ सप्टेंबर, २०१२

यज्ञ संस्कृती !!

आज वातावरणातील प्रदूषण वाढले आहे आणि त्यावर अंतिम उपाय काय असे विचारलं तर 'यज्ञ' करणे हाच सांगता येईल. "कोणत्याही यज्ञातून केवळ धूरच निर्माण होतो, यज्ञ करणे म्हणजे केवळ वेळ, पैसा आणि मनुष्य श्रम वाया घालवणे," असा समज स्वतःला बुद्धिवादी म्हणवणारे काही लोक करीत आहेत. पण याची शास्त्रीयात सिद्ध झाली कि त्यांना विश्वास पटेल. जसे आत्ताच विज्ञानाने शोधलेले देवाचे कण !! हि सृष्ठी निर्माण होण्यामागे जसे gods partical काम करत होते, तेच काही शक्तिंमार्फत यज्ञातून देवांपर्यंत हविर्भाव पोहोचतो आणि त्यांना म्हणजे देवांना शक्ती मिळते असे वेदांत लिहिले आहे. यज्ञ म्हणजे देवांचे मुख आणि तोंड आहे आणि या मुखवटे विशिष्ठ देवतांना दिलेले अन्न म्हणजे यज्ञातील हविर्भाव होय. हीच धारणा वेदांमध्ये आढळते. म्हणजेच यज्ञ म्हणजे आम्ही देवांना शक्ती द्यायची आणि देवांनी ती पुन्हा आम्हाला दुस-या रुपात परत करायची असा सरळ रोकडा व्यवहार असे. एका शक्तीचे रुपांतर आपल्याला पुन्हा हव्या त्या शक्तीमध्ये करता येते. किंबहुना एक शक्ती दुस-या शक्तीत बदलते आणि आपले इच्छित काम करते, हे वैज्ञानिक सत्य आहे. जसे विद्युत शक्ती वापरून इच्छित यंत्रशक्तीद्वारा एका तारेने दिवा लागतो, दुस-या तारेने ध्वनी ऐकू येतो, तिस-या तारेने चित्र पाहू शकतो आणि चौथ्या तारेने वारा घेऊ शकतो. तसे यज्ञात अर्पण केलेले हविर्द्रव्य सुक्ष्म रूपाने, इच्छित मंत्र शक्तीद्वारा, प्रकाशशक्तीद्वारा, ध्वनी शक्तीद्वारा, स्पंदन लहरी निर्माण करून, त्या देवतेला आवश्यक अशा माध्यमातून विशिष्ठ देवतेपर्यंत पोहोचवते आणि आपल्याला अपेक्षित असा परिणाम दिसतो.

रामायण, महाभारत इ. ग्रंथांमध्ये देखील यज्ञाचे महत्व वर्णन केले आहे. द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला म्हणून तिचे एक नाव याज्ञसेनी असे देखील आहे. दशरथा हे घे पायस दान असे म्हणत प्रत्यक्ष अग्नीनारायण त्या यज्ञातून प्रकट झाले आणि त्यांनी दशरथाला पायास दिला. ज्यामुळे पुढे राम, लक्ष्मण आदींचा जन्म झाला.



एके काळी भारतात यज्ञ संस्कृती नांदत होती. अनेक प्रकारचे यज्ञ जसे संतती होण्यासाठी पुत्रकामेष्टि यज्ञ, राज्यविस्तारासाठी राजसुर्य यज्ञ, पाऊस पडण्यासाठी पर्जन्य यज्ञ . केले जात होते. आजही काही यज्ञ केले जातात जसे गृहशांतीयज्ञ, सहस्र मोदक हवन, रुद्र स्वाहाकार यज्, महिम्न स्वाहाकार यज्ञ, रामरक्षा यज्ञ, गायत्री यज्ञ, गणेश यज्ञ, पितृ यज्ञ, दत्त यज्ञ, विष्णु यज्ञ, शतचंडी स्वाहाकार . अनेक यज्ञ आजही केले जातात, पण दुर्दैवाने या अध्यात्मातील वैज्ञानिक सिद्धांत योग्य वेळी योग्य शब्दांत समोर आल्याने काही गैरसमज निर्माण झाले आणि त्यामुळे काही ज्ञान लोप पावले.

यज्ञांमध्ये दोन भाग प्रामुख्याने येतात वैश्विक प्रार्थना किंवा संकल्प आणि कर्मकांड. आरोग्यामध्ये चार भाग शरीर, मन, आत्मा आणि समाज ! यज्ञाच्या दोन्ही घटकांचा आरोग्याच्या चारही घटकांवर होणारे परिणाम आपन पाहुया.




यज्ञ का करायचा याचा संकल्प यजमान करत असतो. हा संकल्प प्रायः सामाजिक असतो. विश्वकल्याणाचा असतो. संकल्पाशिवाय सिद्धी नाही असे म्हणतात त्याप्रमाणे जसा संकल्प केला असेल तसे फळ मिळत जाते. आपल्यावरील जबाबदारी इतरांनी स्वीकारली तर आपल्या शीरावरचा भार हलका होत जातो आणि जबाबदारी स्विकारणारा जर सर्वशक्तिमान परमेश्वरच असेल तर किती हलकेपणा येईल. म्हणुन कार्यारंभी प्रार्थना करुन ईश्वराला आपलासा करुन घेणे हा भाग असतो. हा सामाजीक आणि मानसिक शांतीचा आशय झाला. मंत्रांचे विशिष्ट लयींनध्ये केले जाणारे उच्चारण हा आत्मतत्वाला जागृत करणारा भाग आहे. ईश्वरापर्यंत पोहोचणारी स्पंदने आहेत. नादलहरी आहेत. नादलहरी ईश्वरापर्यंत पोहोचत नाहीत. ईश्वरापर्यंत प्रकाशलहरीच पोहोचु शकतात. नादलहरींचे रुपांतर प्रकाशलहरींमध्ये करुन त्या प्रकाशलहरी त्या ईश तत्वांपर्यंत पोहोचवल्या जाणा-या श्री गणेशासारख्या विशिष्ट देवतांची पुजा प्रथम केली जाते.

यज्ञ म्हणजे अग्नि. मग घरात पेटवलेली चुल, घराबाहेर पेटवलेली शेकोटी आणि यज्ञ यात काही फरक आहे का? आणि यांत आणि यज्ञ यांच्यामध्ये काही फरक आहे का? विशिष्ट पद्धतीने यज्ञातील अग्नीची स्थापना केली जाते. या अग्नीची आपन समंत्र पुजा करतो. हाच फरक आहे घरच्या चुलीतील अग्नी आणि होम किंवा यज्ञातील अग्नीमध्ये ! अग्नी म्हणजे प्रकाश, अग्नी म्हणजे ऊर्जा !! ऊर्जा असेल तरच संदेश वहन होते. यजमान आणि पुरोहित यांच्या करवी हे संदेश वहन अग्नीनारायण करीत असतो. यज्ञाचा पुर्ण फायदा मिळण्यासाठी हे संदेशवहन उत्तम रीतीने झाले पाहिजे. जसे एखादे काम नीट लक्ष देऊन केले तरच त्यातुन अपेक्षित फलनिष्पत्ती होते. अन्यथा ते काम नीट पूर्ण होत नाही, तसेच यज्ञांमधून अपेक्षित फळ मिळण्यासाठी देवतेपर्यंत होणारे संदेशवहन भावपुर्ण झाले तरच ईश्वराकडून कृपा होईल. असो !

घरात जाळलेली लाकडे आणि यज्ञातील समिधा यामधुन तयार होणारी ऊर्जा यात फरक आहे. मुख्य आहे तो संकल्प ! घरातील लाकडे जाळुन जेवण बनवणे हा संकल्प असतो, शेकोटीचा संकल्प शेक घेणे हा असतो, तर यज्ञाचा संकल्प हा विश्वशांतीचा आणि उपस्थित सर्वांना अध्यात्मिक अनुभुती देणारा अस्रतो. म्हणजेच वैज्ञानिक भाषेत बोलायचे झाले तर वैश्विक कल्याणाचा, आत्मोद्धाराचा सर्वोच्च हेतु ठेवुन ईश्वराला, त्या वैश्विक शक्तिला आर्त संदेश प्रकाशामार्फत पाठवणे ही यज्ञाची मूलभुत संकल्पना आहे.

यज्ञामध्ये पंचमहाभुतांची पुजा घडवली जाते. यज्ञवेदी बनवली जाते ती माती आणि पाण्यापासुन म्हनजे पृथ्वी आणि आप महाभुतांचा समावेश, त्या प्रत्यक्ष अग्नीची म्हणजे तेज महाभुताची स्थापना पूजा, मंत्रोच्चार निर्माण होणारा धुर हे वायु महाभुत ! या पंचमहाभुतांच्या एकत्रीकरणातुन मिळते प्रचंड अध्यात्मिक शक्ती !

यज्ञाचा आणखी एक फायदा असतो तो संघशक्तीचा. यज्ञ कधीही एकट्याने केला जात नाही. हे समुहाचे काम आहे, म्हणजेच समष्टीचा विकासही यज्ञ प्रकल्पातुन होत असतो. कठोपनिषदातील वचनच आहेसहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यकरवावहै ….” या शांती मंत्राचा अर्थही विलक्षण आहे. आम्ही सर्व मिळुन, एकत्रितरीत्या काम करुन असा अर्थ सांगणारी ही ऋचा सांघिकशक्ती वाढवणारीच असते.

या यज्ञांमध्ये आहुती घालताना विशिष्ट वनस्पतींचा आणि काही धान्यांचा वापर केला जातो. वड, औदुंबर, पिंपळ, दुर्वा, खैर, रुई, शमी, आघाडा, तीळ, चरु म्हणजे शिजलेला भात, पायस, केळी, नारळ, रेशमी वस्त्र . अनेक हर्वीद्रव्ये वापरली जातात. या द्रव्यांपासुन निर्माण होणारा धूर हा औषधी असतो, हे आता परदेशातील प्रयोगशाळेतही सिद्ध झाले आहे. विशेषतः रशिया, जर्मनी इथे फार मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे.

या वनस्पतींच्या करंगळीएवढ्या जाड आणि एक वीतभर लांब, काड्या हवनासाठी समिधा म्हणुन वापरल्या जातात. या बहुतेक वनस्पती त्वचा विकारांवरील गुणकारी तत्व असलेल्या दिसतात. आयुर्वेदांमध्ये मषी कल्पना नावाची एक औषधी कल्पना आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची चुर्णे जाळुन त्याच्या मषीचा म्हणजेच राखेचा वापर युक्तीने औषधी द्रव्य म्हणुन करावयाचा आहे. जसे त्रिफला मषी म्हणजे त्रिफळा चुर्ण जाळुण त्याची वस्त्रगाळ राख वेगवेगळ्या अनुपानासह वेगवेगळ्या रोगावस्थांमध्ये वापरली जाते. या सर्व वनस्पतींच्या राखेचा वापर त्यांच्यातील औषधी गुणांमुळे केला जातो. ज्या वनस्पती ओल्या वापरल्या तर गुण वेगळे असतात आणि राख वापरली तर गुण बदलतात. यज्ञामध्ये तयार झालेली विभूती ही देखील याच गुणांमुळे औषधी होते. जसे अनेक त्वचा विकार जसे खरुज, नायटा, गजकर्ण, ओले इसब, सोरियासीस, शीतपित्त ( ऍलर्जी, अंगावर खाज आणि गांधी उठणे ), चाई, केस गळणेपिकणे, मुका मार लागणे, सुज येणे, जलोदर . अनेक आजारांमध्ये ही विभुती अत्यंत औषधी काम करते. तसेच दात घासण्यासाठी मंजन म्हणुन, आंघोळीला उटणे म्हणुनदेखिल ही विभुती लावली जाते. आपल्याला आठवत असेल तर कुंभमेळा भरतो तेव्हा अनेक नागा साधु आपले स्रर्व जथ्थे घेउन स्नानासाठी येतात. दिगंबर अवस्थेमध्ये राहणारे हे संन्यासी थंडी, वारा, ऊन यापासुन संरक्षण करण्यासाठी सर्व अंगाला विभुती फासुन राहिलेले असतात. भोलेनाथ शंकर देखिल कैलास पर्वतावर राहतात, अंगाला चित्तभस्म लावतात. हे चित्तभस्म ही एक प्रकारची विभुतीच आहे. बाहेरील तापमान सुनियंत्रीत ठेवण्यासाठी ही विभुती काम करीत असावी. आणि राखेचा आणखीन एक गुण म्हणजे राख / विभुती जलांश त्वरीत शोषुन घेते. ही विभुती शरीरात गेलेली वेगवेगळ्या प्रकारचीटॉक्झिन्सशोषुन घेउन रक्ताला एक प्रकारे शुद्ध ठेवते. शरीरात आतुन वा बाहेरुन हेच शुद्धीकरणाचे काम विभुती करते.

लेडबिटर या विदेशी शास्त्रज्ञाने विशेषतः गायत्री मंत्राच्या सामुहीक पठण केल्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा विशिष्ट तंत्रज्ञान वापरुन मोजली तेव्हा त्याचे निष्कर्ष असे निघाले की गायत्री मंत्राचे पठण जर सामुहीकरित्या केले तर ऊर्जा निर्मिती ही कित्येक पटीने जास्त निर्माण होते. म्हणुन तर गणेश चतुर्थीमध्ये आपल्याकडे सर्वांनी बसुन आवर्तने म्हणण्याची पद्धत परंपरागत आहे. एकत्र साधनेमध्ये व्यक्तींच्या संख्येनुसार शक्तीची बेरीज न होता, गुणाकार होतो. असो !

यज्ञामुळे निर्माण झालेला धूर हा औषधी आहे. यावर परदेशात संशोधन झाले आहे. अग्निहोत्र म्हणजे विशिष्ट पिरॅमिडच्या आकाराचे भांडे घेउन त्यात देशी गाईच्या शेणींपासुन तयार केलेल्या अग्नीमध्ये सुर्योदय व सुर्यास्ताच्या वेळेला देशी गायीच्या तुपात बुडवलेल्या दोन चिमुट अक्षतांची आहुती दिल्यावर वातावरणातील राजयक्ष्मा, कॉलरा इ. जंतुंची वाढ थांबते, असे सिद्ध केले आहे. अग्नीहोत्रामुळे वातावरणातील प्रदुषणही कमी झालेले आढळले. भोपाळमध्ये युनियन कार्बाईडमुळे जी हानी झाली त्यातील एक निरीक्षण लक्षात घेण्याजोगे आहे. ज्या घरामध्ये अग्निहोत्र सुरु होते त्या घरातील एकही व्यक्ती या संहारामध्ये मारली गेली नाही. कोणालाही इस्पितळात भरती व्हावे लागले नाही किंवा आपले घर सोडुन दुसरीकडे जावे लागले नाही, त्यांचे आरोग्य संरक्षण झाले. ( संदर्भ – अग्निहोत्र, तृतीय आव्रुती, परिशिष्ट ३, संकलक – विष्णुदास जाजु, वेदविज्ञान अनुसंधान संस्था, शिवपुरी, अक्कलकोट, सोलापुर)

आपल्या यज्ञ संस्कृती वर आज परदेशात संशोधने होत आहेत आणि आपल्याकडील तथाकथित विद्वान मात्र उगाचच अंधश्रद्धेच्या नावाने गळा काढुन रडत बसले आहेत. याला काय म्हणावे?? वैज्ञानिक दृष्टी वापरुन आपल्या प्राचीन परंपरांकडे पाहीले तर त्यातील काही आश्चर्यकारक तथ्ये बाहेर पडतील. ती द्रुष्टी, ते तेज आपल्याला अग्निनारायण देवो ही प्रार्थना !

लेखक   वैद्य – श्री. सुविनय दामले.बी. ए, एम. एस.
संपर्क  आयुर्वेद चिकित्सालय, अथर्व प्लाझा, कुडाळ, सिंधुदुर्ग, 

३ टिप्पण्या: